मान्सून अंदमानात दाखल, केरळमध्ये आठवडाभरात आगमन, 'असा' आहे हवामानाचा अंदाज

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

नैऋत्य मोसमी वारे अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे.

मान्सूननं निकोबार बेटे पूर्णपणे व्यापली असून अंदमान बेटांचा काही भाग, अंदमान समुद्राचा बहुतांश भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिणेकडचा काही भाग, अरबी समुद्राचा आग्नेय भाग तसंच श्रीलंकेचा काही भाग व्यापला आहे.

दरवर्षी साधारण 20 मेच्या आसपास अंदमानातून मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात होते. यंदा 4 दिवस आधीच मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे.

यंदा केरळमध्येही तो वेळेच्या थोडा आधी म्हणजे 26 मेच्या आसपास दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

पुढच्या 3-4 दिवसांत केरळ आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.

तसंच महाराष्ट्रात दक्षिणेकडेचे जिल्हे, मराठवाड्याचा काही भाग आणि किनारी प्रदेशातील काही भागांत 17 मेपासून सोसाट्याचा वारा, वीजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झाली असली, तरी मध्य भारतात आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांतही काही ठिकाणी उष्ण दिवस आणि उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती कायम राहील.

हवामान

फोटो स्रोत, mausam.imd

दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमान 42 ते 45 अंश सेल्सियसपर्यंत वर जाऊ शकतं.

16 मेच्या उर्वरीत कालावधीसाठी नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला इथे उष्णतेसाठी तर ठाणे, रायगड या जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानासाठी यलो अलर्ट आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर इथे वादळी पावसासाठी यलो अलर्ट आहे. या लगतच्या जिल्ह्यांतही वादळी पावसाची शक्यता आहे.

17 मे रोजी नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला इथे उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड इथे सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह विजा तसंच पावसासाठी यलो अलर्ट आहे. यालगतच्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांतही हलक्या पावसाची शक्यता आहे.

हवामान

फोटो स्रोत, mausam.imd

यावर्षी महाराष्ट्रासह भारतात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं याआधी वर्तवला आहे. 13 एप्रिलला 2026 रोजी यंदाच्या मान्सूनविषयीचा पहिला दीर्घकालीन अंदाज जारी केला होता.

त्यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 92 टक्के (± 5%) पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात या कालावधीत बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी यापेक्षाही कमी पाऊस पडू शकतो.

तर काही ठिकाणी सरासरीएवढा आणि गडचिरोलीसारख्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असंही हवामान विभागानं तयार जाहीर केलेल्या नकाशातून दिसून येतं.

मान्सून ऑनसेट म्हणजे काय?

मान्सून ऑनसेट म्हणजे म्हणजे मान्सूनची सुरुवात. फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नसतं.

तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरुवात झाल्याचं जाहीर करतात.

केरळ आणि लक्षद्वीपमधल्या 14 ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के म्हणजे 9 केंद्रांवर 10 मे नंतर कधीही सलग 2 दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो.

मुंबईसारख्या ठिकाणीही मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर करताना सलग 2-3 दिवस झालेला पाऊस आणि नैऋत्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग अशा गोष्टी विचारात घेतल्या जातात.

मान्सून कुठे तयार होतो?

मान्सूनची निर्मिती कशामुळे होते, याविषयी काही सिद्धांत आहेत.

पृथ्वी 21 अंशांमध्ये कलली आहे. त्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेला असतो. परिणामी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात थंडी असते.

जास्त तापमान असतं तिथे हवेचा दाब कमी तर कमी तापमानाच्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असतो. वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात.

जमिनीपेक्षा समुद्राचं तापमान थोडं थंड असतं, त्यावेळी समुद्राकडून वारे वाहू लागतात. येताना हे वारे समुद्रावरचं बाष्प आणतात, त्यातून पाऊस पडतो.

पण हे असं चित्र पृथ्वीच्या इतर अनेक ठिकाणी होतं. मात्र भारतीय उपखंडातली स्थिती थोडी खास बनवते.

अरबी समुद्राकडून भारतीय द्वीपकल्पाकडे वाहणारे वारे

फोटो स्रोत, BBC Weather

फोटो कॅप्शन, अरबी समुद्राकडून भारतीय द्वीपकल्पाकडे वाहणारे वारे

भारतीय द्वीपकल्पाचा आकार मोठा असून उन्हाळ्याच्या दिवसांत इथलं तापमान वेगानं खूप वाढतं आणि जमीनही तापते.

विशेषतः मे महिन्यापर्यंत राजस्थानच्या वाळवंटात उष्णता वाढते. त्याचवेळी अरबी समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात म्हणजे आफ्रिका, सौदी अरेबियन द्वीपकल्प यांचं तापमानही वाढतं.

परिणामी हिंदी महासागरातून उत्तर गोलार्धात आलेले वारे भारतीय द्वीपकल्पाकडे वाहू लागतात. या वाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणात बाष्पही येतं. त्यातून ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो.

ऑक्टोबर उजाडेपर्यंत तापमान आणि वाऱ्यांच्या दिशेचं गणित बदलतं, वारे ईशान्येकडून वाहू लागतात.

मान्सून हा शब्द कुठून आला? मान्सूनचे प्रकार कोणते?

काही भाषातज्ज्ञांच्या मते, मान्सून या शब्दाचं मूळ अरबी भाषेतल्या मौसीम या शब्दात आहे. मौसीम म्हणजे मोसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे.

दक्षिण आशियात ठराविक काळात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. इतका की त्या काळाला पावसाळ्याचा ऋतू म्हणून इथे स्वतंत्र ओळख मिळाली आहे.

याच मोसमी वाऱ्यांसाठी मान्सून हा शब्द ब्रिटिशकालीन भारतात वापरला जाऊ लागला.

माळशेज घाटात जमलेलेे मान्सूनचे ढग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माळशेज घाटात जमलेलेे मान्सूनचे ढग

भारतात जून ते सप्टेंबर या काळात वारे नैऋत्य दिशेकडून म्हणजे साधारण अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वाहतात. या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे किंवा नैऋत्य मान्सून (साऊथ-वेस्ट मान्सून) म्हणून ओळखतात.

तर ऑक्टोबर महिन्यात वारे याच्या उलट दिशेने म्हणजे ईशान्येकडून वाहतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे किंवा ईशान्य मान्सून (नॉर्थ वेस्ट मान्सून) म्हणतात. या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात दक्षिण भारतात, प्रामुख्यानं तामिळनाडूमध्ये पाऊस पडतो.

नैऋत्य मान्सूनच्याही 2 शाखा आहेत – एक अरबी समुद्रातली आणि दुसरी बंगालच्या उपसागरातली.

मान्सून आपल्यासारखं कॅलेंडर मानत नाही, पण आकडेवारीसाठी सोयीचं म्हणून भारतीय हवामान विभागातर्फे 1 जून ते 30 सप्टेंबर हा नैऋत्य मान्सूनचा कालावधी म्हणून गणला जातो.

तर ईशान्य मान्सून साधारण 20 ऑक्टोबरच्या आसपास सक्रीय होतो.

मान्सूनमुळे किती पाऊस पडतो?

भारतात साधारण 80 टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सूनमुळे पडतो, तर साधारण 11 टक्के पाऊस ईशान्य मान्सूनमुळे पडतो असं हवामान खात्याच्या नोंदी सांगतात.

भारतात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी 87 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो.

मान्सून का महत्त्वाचा?

जून- सप्टेंबर या मान्सूनच्या काळात साधारणपणे वर्षभरातील 70 टक्के पाऊस पडतो. यामुळे शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहिरी भरण्यासाठी मान्सून महत्त्वाचा ठरतो.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतातली शेेती मान्सूवरच अवलंबून आहे.

मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसामुळे तीव्र उष्णतेपासून सुटका होते. पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनंही मान्सून महत्त्वाचा आहे. दक्षिण आशियातल्या अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहेत.

भारतासारख्या शेतीप्रधान देशात आजही अनेक गणितं पावसावर अवलंबून असतात. एका रिपोर्टनुसार भारतातील जवळपास अर्धी शेती ही मान्सूनवरच्या पावसावर अवलंबून आहे.

भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी मान्सून ही लाइफलाईन मानली जाते. कमी किंवा जास्त पावसानं शेतीचं नुकसान होतं.

1925 मध्येे ब्रिटनच्या रॉयल कममिशन ऑन अॅग्रिल्चर इन इंडियानं एका अहवालात भारतीय अर्थव्यवस्था म्हणजेे मान्सूनचा जुगार असल्याचं म्हटलं होतं. 100 वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही.

एल निनो, ला निना आणि मान्सून

एल-निनो आणि ला-निना ही पॅसिफिक महासागरातल्या सागरी प्रवाहांच्या विशिष्ट स्थितींची नावं आहेत.

पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.

या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.

एल निनो

पण फक्त एकट्या एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम होत नाही. तर एल निनोसारखाच हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD हा प्रवाहही महत्त्वाचा ठरतो.

मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज असा वर्तवला जातो

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी काही प्रमुख गोष्टींचा आधार घेतला जातो. त्यातल्या 4 गोष्टी आहेत :

1. इंडियन ओशन डायपोल (IOD) म्हणजेच हिंदी महासागरातील द्विध्रुव. अर्थात या महासागराच्या पूर्व आण पश्चिम भागांतील पाण्याचं असमान तापमान.

IOD सकारात्मक असतो, म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरताना दिसते.

2. एल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) म्हणजे पॅसिफिक महासागरातील एल निनो प्रवाहाची स्थिती.

पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला 'एल-निनो' असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.

या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.

3. उत्तर गोलार्धात हिवाळा आणि वसंत ऋतूत झालेला हिमवर्षाव कमी असतो, तेव्हा त्या वर्षी मान्सूनच्या काळात भारतात पाऊस सहसा जास्त पडतो.

4. जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर, विशेषतः मान्सूनच्या आगमनावर परिणाम होतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)