You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल? जाणून घ्या देशासह महाराष्ट्रातील मान्सूनचा अंदाज
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
यावर्षी महाराष्ट्रासह भारतात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानतज्ज्ञांनी वर्तवलाआहे.
भारतीय हवामान विभागानं 13 एप्रिल रोजी 2026 रोजी यंदाच्या वर्षासाठीचा मान्सूनविषयीचा पहिला दीर्घकालीन अंदाज जारी केलाआहे.
त्यानुसार जून ते सप्टेंबर या नैऋत्य मान्सूनच्या कालावधीत देशात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 92 टक्के (± 5%) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ईशान्य आणि पूर्व भारतातील काही भाग तसंच लडाखचा परिसर वगळता देशातील इतर राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल.
महाराष्ट्रात जून 2026 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे.
मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी यापेक्षाही कमी पाऊस पडू शकतो.
तर काही ठिकाणी सरासरीएवढा आणि गडचिरोलीसारख्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असंही हवामानविभागानं तयार जाहीर केलेल्या नकाशातून दिसून येतं.
हवामानाचा हा अंदाज संपूर्ण मोसमासाठीचा आणि संपूर्ण देशभरासाठीचा आहे, असं हवामान तज्ज्ञ स्पष्ट करतात. पुढच्या काहीआठवड्यांतील निरीक्षणांनी आणखी अचूक अंदाज वर्तवणं शक्य होतं.
यंदा मान्सूनचं आगमन कधी अपेक्षित आहे, याविषयीचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज साधारणपणे मे महिन्याच्या सुरुवातीला वर्तवला जातो. तर मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनच्या चार महिन्यांसाठीचं भाकित जाहीर केलं जातं.
मग हा आता वर्तवलेला दीर्घकालीन अंदाज काय सांगतो? तर दीर्घकालीन अंदाज केवळ एकूण किती पाऊस पडू शकतो आणि कुठेजास्त पावसाची शक्यता आहे, याचं ढोबळ चित्र दर्शवतो.
मात्र त्या पावसाचं वितरण कसं असेल, किती दिवस आणि कसा पाऊस पडेल, हे चित्र या अंदाजावरून निश्चित सांगता येत नाही.
ते स्पष्ट होण्यासाठी आणखी निरीक्षणं करावी लागतात म्हणजे काही आठवडे वाट पाहावी लागू शकते.
दीर्घकालीन अंदाज कशाचा आधारे वर्तवला आहे?
मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज वर्तवण्यासाठी काही वातवरणीय परिस्थिती आणि घटनांचा आधार घेतला जातो.
त्यातल्या तीन प्रमुख गोष्टी म्हणजे एल निनो, इंडियन ओशन डायपोल आणि उत्तर गोलार्धातील हिमवर्षाव.
1. एल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) म्हणजे पॅसिफिक महासागरातील एल निनो प्रवाहाची स्थिती.
पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी या भागातजमा होते, तेव्हा त्या स्थितीला 'एल-निनो' असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.
या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो.
साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.
2. इंडियन ओशन डायपोल (IOD) म्हणजेच हिंदी महासागरातील द्विध्रुव. अर्थात या महासागराच्या पूर्व आणि पश्चिम भागांतीलपाण्याचं असमान तापमान.
IOD सकारात्मक असतो, म्हणजे हिंदी महासागराच्या पश्चिम भागाचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतातमान्सूनला पोषक ठरताना दिसते.
3. उत्तर गोलार्धात हिवाळा आणि वसंत ऋतूत झालेला हिमवर्षाव कमी असतो, तेव्हा त्या वर्षी मान्सूनच्या काळात भारतात पाऊस सहसा जास्त पडतो.
याशिवाय जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर, विशेषतः मान्सूनच्या आगमनावर परिणाम होतो.
यंदा सुपर एल निनोची शक्यता
सध्या पॅसिफिक महासागरात न्यूट्रल स्थिती आहे, आणि ती जूनपर्यंत कायम राहील, असा अंदाज जगभरातील हवामान संस्थांनी वर्तवला आहे.
पण मान्सूनच्या काळातच एल निनो सक्रीय होऊ शकतो, असं भारतीय हवामान विभागानं तसंच अमेरिकेतील नॅशनल ओशनिकअँड अटमॉस्फेरिक अडमिनिस्ट्रेशन या संस्थेनं म्हटलं आहे.
अमेरिकेतील काही हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदा सुपर एल निनो म्हणजे अधिक शक्तीशाली एल निनो तयार होण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम 2026 च्या उत्तरार्धात दिसू शकतात.
त्यात यंदा उत्तर गोलार्धात जानेवारी ते मार्च या कालावधीत झालेल्या हिमवर्षावाचं प्रमाणही सरासरीपेक्षा थोडं कमी राहिलं आहे.
तर इंडियन ओशन डायपोल हा सध्या न्यूट्रल स्थितीत असून, नैऋत्य मान्सूनचा कालावधी संपेपर्यंत तो सकारात्मक स्थितीतयेण्याची शक्यता आहे.
या तिन्हीच्या आधारे यंदा नैऋत्य मान्सूनच्या कालावधीत भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानंवर्तवला आहे.
मान्सूनआधी उष्णतेच्या लाटा
दरवर्षी उन्हाळ्यात भारताच्या मुख्य भूमीचं तापमान वाढत जातं, त्यातून वाऱ्यांची दिशा बदलते आणि मान्सूनची निर्मिती होते.
पण मान्सून येण्याआधीच्या काळातल्या या उष्णतेच्या लाटांची तीव्रता यंदा जास्त जाणवेल अशीही शक्यता वर्तवली जाते आहे.
दरवर्षी साधारण मे महिन्याच्या मध्यापर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये मोसमी वारे वाहू लागतात.
त्यानंतर 1 जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये म्हणजे भारताच्या मुख्य भूमीवर दाखल होतो, 10 जून पर्यंत महाराष्ट्रात पोहोचतोआणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत भारतातून माघार घेतो.
भारतात दरवर्षी साधारणपणे सरासरी 87 सेंटीमीटर (870 मिलीमीटर) पाऊस पडतो. त्यातला 70 टक्के पाऊस जून- सप्टेंबर यानैऋत्य मान्सूनच्या काळात पडतो.
त्यामुळेच शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहिरी भरण्यासाठी हा नैऋत्य मान्सूनचा पाऊस महत्त्वाचा ठरतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.