You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी यांच्यामते केंद्रात काँग्रेसची सत्ता नेमकी किती वर्षं होती? : बीबीसी फॅक्टचेक
- वाचन वेळ: 3 मिनिटे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संसदेत 16व्या लोकसभेतलं शेवटचं भाषण केलं. त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि गांधी परिवारावर वेगवेगळे आरोप केले.
त्यांनी भाषणात म्हटलं की, "काँग्रेसचे 55 वर्षं आणि माझे 55 महिने. त्यांनी 55 वर्षं सत्ता भोगली तर आम्ही 55 महिने सेवा केली."
2014च्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्यावेळीही नरेंद्र मोदी यांनी अशाच प्रकारे नेहरू-गांधी परिवाराला लक्ष्य केलं होतं.
त्यावेळी ते म्हणायचे, "तुम्ही काँग्रेसला 60 वर्षं दिली. त्यांनी भ्रष्टाचार आणि दुरवस्था याशिवाय काहीही दिलं नाही. देशाचं भविष्य सुधारण्यासाठी तुम्ही मला आणि भाजपला 60 महिने द्या."
"तुम्ही मला देशाचा चौकीदार करा जो देशातली संपत्ती घेऊन कुणाला पळू देणार नाही," असही ते त्यावेळी म्हणायचे.
त्यावेळच्या ट्वीटमध्ये काँग्रेस पक्षानं देशावर 60 वर्षं राज्य केलं, असा दावा ते करायचे.
2014मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी 2016मध्ये संसदीय भाषणात तेच वक्तव्य परत एकदा केलं.
"जर काँग्रेसने गरीबांची मदत केली असती तर 60 वर्षांनंतर देशातल्या गरीबांची अशी वाईट स्थिती राहिली नसती. काँग्रेसच्या खराब कामगिरीला आपण विसरू शकत नाही," असा त्यांनी आरोप केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण काळजीपूर्वक ऐकलं तर त्यांच्यासाठी काँग्रेसच्या सत्तेचा कार्यकाळ बदलत राहिला आहे. केवळ मोदी नव्हे तर अमित शाह यांच्यासहित भाजपचे वरिष्ठ नेते यांनी अनेकवेळा काँग्रेसनं भारतावर 70 वर्षं राज्य केलं, असं म्हटलं आहे.
पण वरील सर्वं दावे तसं पाहिलं तर चुकीचे आहेत. अधिकृतरित्या काँग्रेसची एकूण 54 वर्षं, 4 महिने आणि 27 दिवस केंद्रात सत्ता होती.
काँग्रेसची सरकारं
15 ऑगस्ट 1947ला भारत स्वातंत्र्य झाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले.
त्यानंतर काँग्रेसने सलग 29 वर्षं, 7 महिने आणि 9 दिवस केंद्रात सत्ता राखली.
त्यादरम्यान नेहरू, गुलजारीलाल नंदा, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी देशाचे पंतप्रधान राहिले.
इंदिरा गांधी यांची पहिली काराकिर्द 24 मार्च 1977ला संपली. तर 14 जानेवारी 1980ला इंदिरा गांधी परत एकदा भारताच्या पंतप्रधान झाल्या. 31 ऑक्टोबर 1984ला त्यांची हत्या झाली.
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. ते 2 डिसेंबर 1989 पर्यंत पंतप्रधान होते.
1991मध्ये काँग्रेसने परत सत्ता स्थापन केली. तेव्हा 21 जून 1991रोजी पी. व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान झाले. ते 4 वर्षं 10 महिने आणि 26 दिवस भारताचे पंतप्रधान राहिले.
त्यांनंतर मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस 10 वर्षं आणि 4 दिवस सत्तेत होती.
काँग्रेसच्या पाठिंब्यावर आलेली सरकारं
29 जुलै 1979मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर जनता पक्ष (सेक्युलर) अगदी कमी काळासाठी सत्तेत होता. चरण सिहं यांचं सरकार केवळ 170 दिवसांसाठी सत्तेत होतं.
1990 मध्ये समाजवादी जनता पक्षानंही थोड्या काळासाठी सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी चंद्रशेखर पंतप्रधान झाले होते.
त्यांनी 10 नोव्हेंबर 1990 पासून 21 जून 1991 (223 दिवस) सरकार चालवलं.
1996मध्ये काँग्रेससहित 13 पक्षांचं समर्थ घेऊन देवेगौडा यांनी सरकार स्थापन केलं होतं. नंतर काँग्रेसने त्यांचा पाठिंबा काढून घेतला.
1997 मध्ये देवेगौडा यांचं सरकार पडल्यावर इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान बनले होते. तेव्हाही काँग्रेसने ते सरकार जास्त काळ चालू दिलं नाही.
इंद्रकुमार गुजराल हे 332 दिवसांसाठी पंतप्रधान होते. 19 मार्च 1998 रोजी त्यांचा कार्यकाळ संपला. काँग्रेसच्या पाठिंब्यावर इतर पक्षांनी एकूण 2 वर्षं 10 महिने केंद्रात सत्ता चालवली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)