'कॉक्रोच जनता पार्टी'बद्दल सर्वकाही जाणून घ्या 5 महत्त्वाच्या मुद्यांमधून

व्हीडिओ कॅप्शन, 5 मुद्यांमध्ये जाणून घ्या 'कॉक्रोच जनता पार्टी'बद्दल सर्वकाही
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

सामान्यतः भारतात राजकीय पक्ष आंदोलनातून तयार होतात. परंतु, कॉकरोच जनता पार्टीचा (सीजेपी) जन्म मात्र 16 मे रोजी सोशल मीडियावर अचानक झाला होता. याची सुरुवात उपहासात्मक ऑनलाइन मोहिमेच्या रूपात झाली होती.

15 मे रोजी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याबाबत एक भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, "समाजात आधीच व्यवस्थेवर हल्ला करणारे काही परजीवी आहेत."

"तुम्हालाही त्यांच्यात सामील व्हायचं आहे का? काही तरुणांना रोजगार मिळत नाही किंवा करिअरमध्ये जागा मिळवू न शकल्याने ते कॉक्रोचसारखे (झुरळ) सगळीकडे पसरतात."

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या या वक्तव्यावर मोठ्याप्रमाणात टीका झाली. या टीकेनंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं असं त्यांनी म्हटलं.

ते म्हणाले, "15 मे रोजी एका निरर्थक प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केलेल्या माझ्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांतील एका गटाने चुकीचा अर्थ लावला, हे पाहून मला वाईट वाटलं."

CJP

फोटो स्रोत, CJP

"माझी टीका अशा लोकांवर होती, जे बनावट किंवा खोट्या पदव्यांच्या आधारावर वकिलीसारख्या क्षेत्रांत आले आहेत. असे लोक प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित क्षेत्रांतही शिरले आहेत. त्यामुळे ते परजीवीसारखे आहेत."

पण तोपर्यंत 'कॉक्रोच' हा शब्द भारतातील राजकीय चर्चेचा भाग बनला होता. 16 मे रोजी 30 वर्षीय अभिजीत दिपके यांनी एक्सवर एक गुगल फॉर्म शेअर करून लोकांना कॉक्रोच जनता पार्टीत नोंदणी करण्याचं आवाहन केलं.

अवघ्या काही तासांत अभिजीत यांना 5 हजारांहून अधिक नोंदणी मिळाल्या. इंटरनेटवर सुरू झालेला हा विनोद हळूहळू लोकांचा असंतोष, विनोद आणि राजकीय निराशा व्यक्त करणाऱ्या एका अनौपचारिक संस्थेत बदलला.

अभिजीत सध्या अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्समध्ये मास्टर्स करत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल सांगितलं, "कॉक्रोच हा तरुणांच्या नाराजीचा आवाज आहे. सरन्यायाधीशांनी तरुणांना कॉक्रोच आणि परजीवी म्हटल्याच्या वक्तव्याविरोधात ही भावना आहे."

"भारतासारख्या लोकशाही देशात हे मान्य होऊ शकत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षक मानले जातात. टीकेमुळे तरुणांचा अपमान झाला आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.